रामरक्षा स्तोत्राची निर्मिती कशी झाली व त्यांचे फायदे काय??

ramrakshastotra 

रामरक्षा स्तोत्र हे सर्वांना माहीत असणारे स्तोत्र आहे. मी लहान असताना आमच्या शाळेत रामरक्षा स्तोत्र पठण घेतले जायचे. सद्यस्थितीत घेतात की नाही माहीत नाही, पण घेतले पाहिजे असे मला वाटते. तरी ठीक आहे, शाळेत जाउद्या पण कमीत कमी आपण रोज तरी घरी पठण करतो का, हा तरी एक प्रश्नच आहे. पठण करत नसाल किंवा मूल पठण करत नसतील तर त्यांना सांगा करायला. कारण भगवान राम हे आपल्या भारत भूमीचे आराध्य दैवत, भगवान राम हे आपणास जगावे कशे हे शिकवतात. हा सर्व विचार मनात आल्यावर अजून एक विचार आली की, रामरक्षा कोणी लिहिली? हे माहीत आहे पण कशी लिहिली गेली?? याबाबत उत्सुकता आली. मग कशी लिहिली गेली ते  खालील प्रमाणे..   

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने भगवान शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.

ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.

शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते, त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.

ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.

त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी भगवान शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले, मग काय त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली.

काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव बुधकौशिक ऋषी

रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने होणारे फायदे

  • राम रक्षा स्तोत्र श्रद्धावानांना सर्व प्रकारच्या आपत्तीपासून वाचवते.
  • त्याच्या पठणाने ऐकण्याने श्रद्धावान निर्भय बनतो
  • नियमित वाचनाने सर्व समस्या दूर होतात व तो दीर्घायुष्य आनंदी विजय व संत बनतो
  • मंगळाचे दुष्परिणाम संपतात
  • रामरक्षाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक ढाल तयार होते व त्याचे संपूर्णपणे नखापासून केसा पर्यंत संरक्षण केले जाते.